26 जुलै २००५ हा दिवस कोणच विसरु शकत नाही. या दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती. वरुणराजाची अवकृपा मुंबईकरांनी अनुभवली. जनजीवन विस्कलीत झालं. अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले तर अनेकजण वाहून गेले. अनेकांनी आपला जीवसुध्दा गमावला. त्या काळ्या दिवसाची आठवण आली तरी अंगावर शहारे येतात. याच २६ जुलैवर आधारित एक नवा कोरा मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय.
अज्या म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण या सिनेमात भूमिका साकरतोय. त्यानेच सोशल मिडीयाद्वारे चाहत्यांना ही आनंदवार्ता सांगितली. नितीश म्हणतो, "२६ जुलै याच दिवशी १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै २००५ चा महापुराचा तो दिवस.. मुंबईकरांच्या आयुष्यातील एक काळा कुट्ट दिवस ठरला..
मुंबई आणि उपनगरात आलेल्या याच नैसर्गिक आपत्तीवर आधारित "२६ जुलै मुंबई" या माझ्या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर आम्ही प्रदर्शित करीत आहोत.."
अनोखा विषय आणि अजिंक्य फेम नितीश चव्हाणचा सिनेमा म्हणून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. सर्वांनीच या सिनेमाच्या या मोशन पोस्टरवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.