By  
on  

Exclusive : अनुराग कश्यपच्या ‘गुलाबजामुन’चा पाक बिघडला, ही जोडी पडली सिनेमातून बाहेर

अनुराग कश्यप वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखला जातो. हटके कथानक आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे त्याचे सिनेमे मुख्य प्रवाहापेक्षा वेगळे ठरतात. अनुराग कश्यप सध्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी गुलाबजामुन या सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त असल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन काम करणार होते.
पण कुठे माशी शिंकली काय माहीत ही जोडी आता अनुरागच्या सिनेमामधून बाहेर पडली आहे. विशेष म्हणजे फिल्मीस्तानमध्ये अशीही चर्चा होती की या सिनेमात बिग बी ही काम करणार होते. पण पटकथेतील काही बाबी खटकल्याने बिग बींनी हा सिनेमा सोडला. त्यानंतर लगेचच अभि-अ‍ॅशने देखील या सिनेमातून काढता पाय घेतला आहे. असं म्हटलं जातं की या सिनेमातील काही बाबींवर बच्चन कुटुंबाला आक्षेप होता.
त्यामुळे या कथानकातही बदल करण्यात आले. तरीही बच्चन मंडळींचा नाराजीचा सूर कायम राहिला. या सिनेमात या तिघांनी एकत्र काम केलं असतं तर जवळपास ८ वर्षांनी हे कुटुंबिय एका सिनेमात काम करताना दिसले असते.
वैशिष्ट्यपूर्ण नाव असलेल्या या सिनेमात तीन पिढ्यांचा प्रवास दाखवला जाणार आहे. पण आता या सिनेमात बच्चन यांच्या जागी कुणाला घ्यायचं हा प्रश्न अनुरागला पडला तर नवल नाही. या सगळ्या प्रकरणात बच्चन कुटुंबिय आणि अनुराग कश्यप यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. पण यातील सत्य पीपिंगमून तुमच्यासमोर नक्कीच आणेल.

Recommended

PeepingMoon Exclusive