मराठी मालिकांमध्ये सध्याच्या घडीला मोठी स्पर्धा सुरु आहे. अनेक नवनव्या विषयाच्या , धाटणीच्या मालिका नवे चेहरे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. करोना लॉक़डाऊनच्या काळात सिनेमागृह आणि इतर प्रेक्षणीय स्थळं व मनोरंजनाची ठिकाणं बंद असल्याने सर्व भिस्त छोट्या पडद्यावर होती. यात अनेक मालिका प्रदर्शित झाल्या. पण या मालिकाचं गणित हे सारं काही टीआरपीच्या आकड्यांवर अवलंबून असतं. या रेसमध्ये जो टिकला तोच जिंकला.
झी मराठीवर मागच्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली येऊ कशी तशी मी नांदायला ही लोकप्रिय मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर आहे. शाल्व किंजवडेकर व अन्विता फलटणकर या जोडीने आपल्या अफलातून केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची व्याख्या तिनं तिच्या अभिनयातून बदलली; असं प्रेक्षक आवर्जून सांगतात. तिचा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांना आपलासा वाटला. पण, आता ही मालिका अंतिम टप्यात आली आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय.
सूत्रांनुसार या मालिकेच्या जागी स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर अभिनित 'तू तेव्हा तशी' ही मालिका सुरु होणार आहे. नव्या मालिकेसोबतच येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या शेवटाकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.