आज सिनेसृष्टीत स्पर्धा इतक्या वाढल्या आहेत की प्रत्येकाला आपलं स्वत:चं अस्त्तित्व निर्माण करण्याची प्रचंड धडपड असते. त्यासाठी कितीही मेहनत आणि कष्ट करण्याचीसुध्दा प्रत्येकाची तयारी आहे. पण आपण केलेल्या मेहनतीचं जर श्रेयच आपल्याला मिळणार नसेल तर त्या गोष्टीला काय अर्थ उरला. तरीही श्रेय न देता समोरची व्यक्ती आपल्याकडून अपेक्षा ठेवतेच. म्हणूनच मग यातून निर्माण होते ती तीव्र चीड व व्यक्त केला जातो संताप.
लेखक आणि गीतकार हे एका यशस्वी सिनेमाचे असे दोन दुवे असतात की त्यांच्यावरच संपूर्ण सिनेमाची मदार अवलंबून असते, गीत जर छान असेल तर प्रेक्षकांना ते प्रचंड भावतं आणि त्याला भरघोस प्रसिसादही मिळतो. ते गीत नेहमी गुणगुणलं जातं. परंतु ृकाहीसा चीड निर्माण करणारा प्रकार नुकताच प्रसिध्दीच्या झगमगाटापासून दूर असणा-या एका गीतकाराबाबतीत घडला आहे.
सिध्दार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे या जोडीची प्रमुख भूमिका असणारा 'मिस यू मिस्टर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा आज ३ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. याचे निमंत्रणसुध्दा सर्व प्रसिध्दी माध्यमांकडे पोहचले असले तरी या निमंत्रण पत्रिकेवर गीतकाराचा उल्लेखच नाही. म्हणूनच या रंगारंग सोहळ्यापूर्वीच ह्या सिनेमाचे गीतकार वैभव जोशी यांनी आपली व्यथा सोशल मिडीयाद्वारे मांडली आहे. त्यासाठी कारणही तसंच आहे, तुम्ही ते जाणून घेतलं की, तुम्हालाही संपूर्ण प्रकार लक्षात येईल.
वैभव जोशी यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली होती. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,"जेव्हा सिनेमासाठी गाणं लिहून हवं असतं तेव्हा निर्माते फारच प्रेमळ आणि दयनीय होऊन मागणी करतात आणि गोड वागणूक देतात. पण नंतर ते आमच्याकडे फिरकतसुध्दा नाहीत व तरीही ते अपेक्षा ठेवतात की सिनेमाच्या प्रोमोशनला आम्ही हजर रहावं आणि सिनेमाच्या पोस्ट शेअर कराव्यात." वेभव यांच्या ह्या पोस्टनंतर अनेक गीतकारांच्या आणि सिनेसृष्टीतील वर्तुळातून त्यांना पाठिंबा दर्शविणा-या प्रतिक्रीया आल्या.
गीतकार वैभव जोशी यांच्या ह्या संतापजनक फेसबुक पोस्टनंतर 'मिस यू मिस्टर'च्या निर्मात्यांनीया प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांची माफी मागितली आणि सिनेमाच्या म्युसिक लॉंचच्या निमंत्रण पत्रिकेचे डिझाईनसुध्दा तात्काळ बदलण्यास सांगितले. म्हणून मग पुन्हा एक फेसबुक पोस्ट करत गीतकार वैभव जोशी यांनी ह्या संपूर्ण माफीनाम्याची सविस्तर माहिती दिली.
ह्या संपूर्ण प्रकरणावरुन एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला. तो म्हणजे श्रेयाचा. एखाद्या गीतकाराच्या मेहनतीवरच जर ते संपूर्ण गाणं आज सादर होतं आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळतोय, मग साधं सिनेमाच्या पोस्टरवर गीतकार म्हणून श्रेयही मिळू नये, ही फार उद्वीग्न करणारी बाब आहे.
https://youtu.be/HHLC-P0LY8g