महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट घोंघावत आहे याचा तोडगा म्हणून महाराष्ट्रभर वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. या वर्षी "पळशीची पीटी" सिनेमाच्या टीमने देखील 'पानी फाउंडेशन'च्या साहाय्याने श्रमदान करून महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दुष्काळग्रस्त गावांना मोलाचा हातभार लावला, परिणामी या दुष्काळग्रस्त गावात आता पावसामुळे भरभरून जलसंपत्ती निर्माण झाली आहे. ही बातमी पळशीची पीटी ला कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
पळशीची पीटी सिनेमातील कलाकार कामाच्या वेळा सांभाळत कलाकार अभिनेत्री - 'किरण ढाणे', राहुल मगदूम, संदीप जंगम, राहुल जगताप आणि धोंडीबा कारंडे यांनी सांगली,सातारा आणि सोलापुर या तीन जिल्हयातील सहा गावात जाऊन श्रमदान केले तसेच सिनेमाच्या टीमने 'पानी फाउंडेशन'शी संपर्क साधून श्रमदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या चमूचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील अशी गावे निवडली जेथे पाणी संधारणेचे काम झाले नाही.
दिग्दर्शक धोंडीबा कारंडे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी संगितले 'महाराष्ट्रात जलसंधारणे मध्ये अग्रेसर असलेली संस्था पानी फाउंडेशनचा चार दिवसीय शिबीरात सहभागी झालो होतो,तसेच मला निसर्ग संधारणेची खुप आवड आहे पण कामाच्या वेळेअभावी काही जमले नव्हते. परंतु या निमित्ताने ते जमले. कर्नाटकाच्या बॉर्डर जवळील गावात गेल्यावर तिथल्या लोकांनी फेटे आणि हार घालुन आमचे स्वागत केले,त्यांच्या कडून कळले की आजपर्यंत इतक्या लांब कोणतेही कलाकार श्रमदानासाठी तिथे पोहचले नव्हते.''
धोंडीबा कारंडे पुढे म्हणाले,''तिथे शाळेतील शिक्षक सुट्टीवर घरी न जाता शाळकरी मुलांसोबत भर उन्हात श्रमदानाचे काम करत होते.. या कामाचं यश अस की आता त्या गावांना जलसंपदा लाभली आहे....आमच्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं. लोकांच्या मेहनतीमुळे या गावात जवळपास पन्नास लाख लीटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. १५० रु टँकर ने त्यांनी ५० लाखाची कमाई केल्याचे समजले यामध्ये 'पळशीची पीटी'चा खारीचा वाटा होता .आम्हाला आबा लाड यांच्यामुळे पानी फाउंडेशन सोबत काम करायला मिळाले त्यामुळे त्यांचे मनापासून आभार.''
दिग्दर्शक आणि निर्माता धोंडीबा कारंडे यांचा "पळशीची पीटी... गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची !" येत्या २३ ऑगस्ट २०१९ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.