राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. 'भोंगा' सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे मराठीत अगदी क्वचित आढळतात.राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या सिनेमातून कायमच हा प्रयत्न करत वास्तवाची जाणीव करून दिली आहे. असाच वेगळा विषय असलेल्या त्यांच्या ‘भोंगा’या आगामी सिनेमाची १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवामध्ये निवड झाली आहे.
'नाळ' या मराठी सिनेमातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे. 'नाळ' याच सिनेमासाठी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता स्वानंद किरकिरे याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या (चुंबक) पुरस्कारावर नाव कोरले आहे तर आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केलेल्या 'पाणी' या सिनेमाला 'पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट सिनेमा' हा पुरस्कार मिळाला आहे.
तसेच वीणा जामकरची प्रमुख भूमिका असलेला 'खरवस'ला 'बेस्ट शॉर्ट फिल्म' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावरूनच यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी सिनेमांनी स्वतःची मोहोर उमटवलेली पाहायला मिळत आहे.