By  
on  

विनोदाचा बादशहा भाऊ कदम यासाठी झालेत नाराज, सोशल मिडियावर व्यक्त केली नाराजी

भाऊ कदम हे नाव काढलं की त्यांच्या विनोदी भूमिका आठवून ओठांवर हसू आल्याशिवाय रहात नाही. आपल्या हरहुन्नरी अभिनयामुळे भाऊंनी रसिकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.
पण आता अशी एक घटना घडली आहे की सर्वांना हसवणारे भाऊ नाराज झाले आहेत. भाऊंचा नशीबवान हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला सध्या थिएटर मिळत नाहीये. त्यामुळे व्यथित झालेल्या भाऊंनी फेसबुक पोस्ट्च्या माध्यमातून कैफियत मांडली आहे.
खरं तर मराठी सिनेमाला शोदरम्यान थिएटर न मिळणं हे पहिल्यांदा घडलं नाही. मध्यंतरी ‘भाई: व्यक्ती कि वल्ली’ सिनेमांच्या शोला ही थिएटर मिळत नव्हते. खरं शासनाने यासंबधी काही तरी पावलं उचलणं गरजेचं आहे. वितरकांच्या मुजोर लॉबीमुळे मराठी सिनेमांना नुकसान सहन करावं लागतं.
अशी आहे भाऊंची फेसबूक पोस्ट –
खादा परभाषीय चित्रपट 'हिट' होऊन जातो आणि रातोरात आपल्या मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून हे दाखवलं जातं की तुमचा 'मराठी' चित्रपट चालतच नाही. मध्यमवर्गीयांसाठी बनवलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. मग बोंब उठवली जाते की, तुमचा मराठी चित्रपट बघायला तुमचेच मराठी प्रेक्षक येत नाहीत. 'नशीबवान' च्या निमित्ताने मला आणि माझ्या निर्मात्यांना याचीच प्रचिती आली. ज्या डोंबिवली चा उल्लेख मी हवा येऊ द्या च्या प्रत्येक भागात करतो, ज्या 'डोंबिवलीचा मी' म्हणून मी गर्वाने सांगतो, तिथेसुद्धा 'नशीबवान' ला पहिल्या आठवड्यात एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही. आमचा संपूर्ण चित्रपट मुलुंडमध्ये चित्रित झाला आहे. तिथेही एकाही चित्रपटगृहात 'नशीबवान' ला स्थान मिळाले नाही. कित्येक लोक चित्रपटगृहात जाऊन परत फिरले आणि ऑनलाइन बुकींग करून गेलेल्यांना शो कॅन्सल झाल्याचे कारण देऊन 'हिट' झालेल्या हिंदी चित्रपटाची तिकिटं त्यांच्यावर लादली गेली. एका दाक्षिणात्य चित्रपटाने ह्या आठवड्या अखेरीस मुंबईत सव्वाशेहून अधिक शो अडवले पण आपण आपल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटासाठी साधा एक शो राखू शकत नाही. काबाडकष्टाने चित्रपट तयार करणारे निर्माते आता प्रदर्शनासाठीही खस्ता खात आहेत. एक-एक चित्रपटगृह मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.
ज्या हिंदी चित्रपटसृष्टीला खत पाणी घालून आपल्या महाराष्ट्राने जोपासलं, मोठं केलं ती आपल्या मराठी सिनेमाची अशीच पायमल्ली करत राहणार का? आपल्या मराठी चित्रपटाला निदान महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का?

Recommended

PeepingMoon Exclusive