By  
on  

अली अब्बास जफरच्या 'भारत'मध्ये प्रियंकाची जागा घेणार कतरिना कैफ

सलमान खान स्टारर ‘भारत’ सिनेमा प्रियंका चोप्राने सोडल्यानंतर तिच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावरुन अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. अनेक अभिनेत्रींचे नाव या भूमिकेसाठी चर्चेत होते. सर्वप्रथम ही भूमिका बेबोच्या म्हणजेच करिना कपूरच्या वाट्याला येणार असे बोलले जात होते. पण नुकत्याच हाती आलेल्या मिडीया रिपोर्ट्सनुसार दिग्दर्शक अली अब्बास जफर आपली खास मैत्रिण कतरिना कैफला ‘भारत’मधील प्रियंकाची भूमिकेसाठी फायनल करत आहेत आणि सप्टेंबरपासून ती शूटींगला सुरुवात करणार आहे.

मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अली अब्बास म्हणाले, “सलमान आणि कतरिना कैफसोबत एकत्रित काम करण्यासाठी मी खुप उत्साहित आहे. यापूर्वी आम्ही एकत्र काम केले आहे. कतरिनाला आम्ही फारच कमी कालावधीत फायनल केलं आहे.”

जवळपास ब-याच वर्षानंतर प्रियंका चोप्रा ‘भारत’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होती. या सिनेमात ती सुपरस्टार सलमान खानसोबत तब्बल दहा वर्षानंतर झळकणार होती. परंतु प्रियंकाने हा सिनेमा सोडला असून तिने ‘भारत’ला अलविदा केले. प्रियंका आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनस लवकरच लग्न करण्याच्या तयारीत असल्याने तिने ‘भारत’ सिनेमा सोडल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे प्रियंकाने एका हॉलिवूड सिनेमासाठी ‘भारत’ला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे.

तसंच प्रियंकाने ‘भारत’ सिनेमाला अलविदा केल्यानंतर बॉलिवूडचा दबंग खान आणि या सिनेमातील तिचा सहकलाकार सलमान तिच्या या निर्णयावर प्रचंड भडकल्याचे वृत्त होते. परंतु सलमान खानद्वारे असे कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्यापतरी आलेले नाही. पण सलामनचे वडील सलीम खान यांनी याबाबत आपले मौन सोडले आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सलीम खान यांनी याबाबतचा एक खुलासा केला आहे, ते म्हणाले “ प्रियंका कोणी पहिली व्यक्ती नाही, जिने सिनेमा सोडला. अनेकजण सिनेमे सोडतात. कधी कोणी तारखांमुळे किंवा मानधनामुळे किंवा भूमिकांमुळे सिनेमे सोडतात. प्रियंकाने ‘भारत’ सोडला असला तरी तिच्या जागी नवी अभिनेत्री लवकरच येईल. मी किंवा सलमान दोघंही प्रियंकावर अजिबात नाराज नाही.”

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive