'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..' हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रुप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवी उर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होत असल्यामुळे, स्वामींचा अगाध महिमा आता रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे.
कारण, स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' असे या सिनेमाचे शिर्षक असून, खास दसऱ्याच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. दादरच्या प्रसिद्ध स्वामी समर्थांच्या मठात दसऱ्याच्या दिवशी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतले स्वामीभक्त कलाकार अंकुश चौधरी, सतीश पुळेकर आणि किशोरी अंबिये यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
पर्व क्रिएशन्स निर्मिती 'श्री स्वामी समर्थ' या सिनेमाचे लेखन दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनीच केले असून, या सिनेमातील स्वामी समर्थांच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे, स्वामींच्या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडीशन घेतली जाणार असल्याचे कळते. शिवाय या सिनेमात मराठीतील दिग्गज कलाकारांचीदेखील भूमिका असणार आहे.