By  
on  

PeepingMoon Exclusive : "हल्ली टिव्हीवरील मालिकांमध्ये जे हरवलय ते ओटीटीवर पाहायला मिळतय", शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली खंत

मराठी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून आजवर विविध भूमिकांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते शरद पोंक्षे आता ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून शरद पोंक्षे वडीलांच्या भूमिकेत झळकणार आहेत. बहुता खलनायक किंवा गंभीर भूमिकांमधून म्हणून दिसणारे शरद पोंक्षे या सिरीजमधून विनोदी छटा असलेली भूमिका साकारत आहेत. प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही सिरीज लवकरच प्रदर्शित होणारेय. या सिरीजच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने त्यांच्यासोबत खास संवाद साधलाय. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मालिका यांच्यातला मोठा फरक सांगितलाय. शिवाय टेलिव्हिजनवरील मालिकांची सध्याची स्थिती बघवत नसल्याचही सांगितलं. 

ते म्हणतात की, "ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करुन छान वाटतय. मालिका आणि ओटीटीमध्ये मोठा फरक आहे. इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंतची गोष्ट माहिती असते. इथे कॅरेक्टरचा प्रवासही माहिती असतो. मालिकांमध्ये उद्याचं काय तेही माहिती नसतं. ओटीटी म्हणजे एका मोठ्या सिनेमासारखं आहे. ओटीटीवर मोजके भाग असतात. गोष्ट जिथे संपते तिथेच ओटीटीची मालिका संपते. उगाच आवडते म्हणून पाणी घालून मोठं करत नाही. मालिकांसारखे फाटे फुटत जात नाहीत. त्यामुळे करायला जास्त मजा येते. हल्ली टिव्हीवरील मालिकांमध्ये जे हरवलय ते ओटीटीवर पाहायला मिळेल. काहीही दाखवतात ते बघवत नाहीत."

याशिवाय या सिरीजमधील त्यांच्या भूमिकेविषयीही त्यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात खलनायक आणि गंभीर भूमिका साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांच्या वाट्याला हलक्या फुलक्या विनोदी भूमिका कमी आल्याचं ते सांगतात.

"मी उत्तम विनोदी अभिनय करु शकतो. हे मला सांगावं लागतं नेहमी. माझा आवाज, माझं व्यक्तिमत्त्व आणि डोळे याच्यामुळे माझ्याकडे खलनायकी भूमिका खूप आल्या. त्या खूप लोकप्रिय ठरल्या. 'वादळवाट' जेव्हा लोकप्रिय झालं त्यानंतर सगळ्या खलनायकी भूमिका येऊ लागल्या. 'मी नथुराम गोंडसे बोलतो' नाटकानंतर तर विचारांनी भारलेला राष्ट्रवादी तर अशाच भूमिका येऊ लागल्या. त्यामुळे हलक्या फुलक्या विनोदी भूमिका फार कमी आल्या. मी अमीत कान्हेरेचे आभार मानतो की या भूमिकेसाठी माझा विचार केला."

Recommended

PeepingMoon Exclusive