नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं. दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात. यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय.
गेल्या दशकभरापासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. नवरात्रीच्या दिवसांत नऊ रंगांना खुप महत्त्व प्राप्त होतं. आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा नवरंगोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघायला खुप आवडतं. विविध नऊ रंगातले फोटोस त्या ह्यानिमित्ताने चाहत्यांशी शेअर करतात.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते. आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी कुष्मांडा देवी. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीने ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहे. सुखकारक असा गडद रंग या देवीचा आवडता रंग आहे. म्हणून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात.