आज दिवसभर एक मुद्दा प्रचंड गाजला तो म्हणजे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा. रायगड पोलिसांनी अर्णब यांच्याविरोधात ही कारवाई केली. अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे विविध पडसाद उमटतायत. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनीसुध्दा प्रतिक्रिया दिली आहे. एका अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
एका विधवा मराठी भगिनीला न्याय मिळण्यासाठी अटक करण्यात आलेल्या अमराठी व्यक्तीसाठी महाराष्ट्रातील मराठी भय्ये नेते शिमगा असल्यासारखे का बोंबलत आहेत? महेश टिळेकर
Posted by Mahesh Tilekar on Tuesday, November 3, 2020
महेश टिळेकर सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. विविध सामाजिक घडामोडींवर ते रोखठोक मतं मांडतात. यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “एका विधवा मराठी भगिनीला न्याय मिळण्यासाठी अटक करण्यात आलेल्या अमराठी व्यक्तीसाठी महाराष्ट्रातील मराठी भय्ये नेते शिमगा असल्यासारखे का बोंबलत आहेत?” अशा शब्दात त्यांनी राजकीय नेत्यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव पैसे थकवल्याप्रकरणी नमूद करण्यात आलं आहे.
संपादक अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचेही पाहायला मिळतेय.