मराठी सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर चांगली जुंपली आहे. महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्यावर लिहिलेल्या पोस्टवरुन आरोह वेलणकरने टिळेकर यांच्यावर निशाणा साधला. "स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि ही कसली भाषा? तुमची टीका वाचून लाज वाटली. तसंच तुमच्या मराठी तारका या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू," असं आरोह वेलणकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
आरोहच्या ह्या पोस्टला महेश टिळेकर यांनीसुध्दा आपल्या फेसबुक पोस्टमधून जबरदस्त उत्तर दिलं आहे. “जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकीवजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं?”
नेमका वाद
अमृता फडणवीस यांचं ‘तिला जगू द्या’ हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? असा सवाल महेश टिळेकरांनी फेसबुकद्वारे केला.
आरोह वेलणकरने व्यक्त केला संताप
‘महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही कसली भाषा तुमची? नसेल आवडत तर नका एैकू, टीका करायची तर तमा बाळगून करा! कोण समजता तुम्ही स्वत:ला!?
ह्या आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि काही नटांवर तुम्ही अशीच टीका केली होती, तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करून, ओढून, पीऊन, समजून करता हे कळणं कठीण आहे! फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं! सुधरा…
राहिला प्रश्न मराठी तारकांचा, तर ह्या पुढे ह्या तुमच्या स्टंटमुळे तुमच्या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू!’, अशी पोस्ट आरोहने फेसबुकवर लिहिलं.
आरोहला टिळेकरांचं उत्तर
आरोह वेलणकर…बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय. कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार? आधी स्वतः चे करिअर बघ आणि पब्लिसिटी मिळवण्यासाठी तूच बिग बॉस मध्ये गेला होतास ना? का तिथे समाजसेवा करायला गेला होतास? ज्या कलाकारांच्या वर टीका केली तेव्हा का तू बिळात जाऊन बसला होतास? ते तुझे समविचारी दिसतायेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का? जेव्हा मराठी कलाकारांची लायकी ट्रेननी फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते तेव्हा तुझे रक्त उसळले नाही का?
तेव्हा कलाकारांची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस रे? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. आता तुझा जळफळाट होतोय तेव्हा कुठं गेला होतास रे तू, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा, महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते तेव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक.जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेणाऱ्यातला मी नाही आणि आठवत नसेल तर नीट आठव पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिस मध्ये भेटून तू माझ्या कडे काम मागत होतास, ते विसरलास का? जिथं बोलायचं तिथं बोलतो मी ,आणि तुझ्यात खरीच हिम्मत असेल तर समोर येऊन धमकी दे.