'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु सोशल मिडीयावर आपल्या ज्वलंत लेखणीमुळे प्रसिध्द असलेले किरण माने यांना स्टार प्रवाहवरील या मालिकेतून कुठलीच पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आलं, असं त्याचं म्हणणं. तर चॅनेलने निवेदन जारी करत किरण माने यांच्या महिलांसोबतच्या गैरवर्तवणुकीमुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं स्पष्टिकरण दिल.
हा वाद आता बराच विकोपाला गेलाय. अनेत आरोप-प्रत्यारोप याप्रकरणी होत आहेत. तर याच मालिकेतील अनेक महिला सरहकलाकार या किरण मानेंच्या बाजूने उभ्या आहेत. तर इतर महिला कलाकार या त्यांच्याविरोधात.
पुन्हा एकदा किरण माने यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट लक्ष वेधून घेतेय.
किरण माने म्हणतात,"मी लाडानं तुला 'म्हातारे' अशी हाक मारायचो... अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते... "किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय." असं तुला वाटायला लागलं... तू मेकअपरुमध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस... तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते.. तुला काही फॅक्टस् सांगीतल्यावत्या... नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती...प्राॅडक्शन हाऊसमधुन लेखकांना सांगीतलं गेलंवतं की सविताताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीसबी.. आपण हसलो... आणि मग पुन्हा आपलं "म्हातारेS-इलासाS " सुरू झालं...
परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं...
पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं... कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा.. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं??? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं???? त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवलावता...असो. त्यांची तुझ्यावर कृपा राहो.
..माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही !
झगडणार... लढणार...तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासाचा इस्वास हाय... जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन.. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन.सातारी कंदी पेढे आणून देईन.. पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं !
तुझ्यावर राग नाय गं माझा.."