'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. एका बाप मुलीच्या नात्याची ही निरागस कहाणी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जाते. परंतु सोशल मिडीयावर आपल्या ज्वलंत लेखणीमुळे प्रसिध्द असलेले किरण माने यांना स्टार प्रवाहच्या या मालिकेतून काढल्यानंतर बराच वादंग पेटला. या प्रकरणाला राजकीय रंगही देण्यात आला. बरेच दिवस हे प्रकरण वेगवेगळ्या पैलूंनी चर्चेत राहिलं. अखेर अभिनेते किरण माने यांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला प्रसिध्द वकील असीम सरोदे उपस्थित होते.
किरण माने यांनी प्रोडक्शन हाऊसकडे 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यापूर्वी प्रोडक्शन हाऊसने किरण यांची महिलांशी गैरवर्तवणुक करतात या आरोपावरुन हक्कालपट्टी केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर किरण माने प्रकरण खुप गाजलं.
तसंच किरण माने ह्यांनी एक मोठी कायदेशीर नोटीस सादर केली आहे. यात विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.ते म्हणतात, "महिलांशी गैरवर्तवणुक केली अशा प्रकारची नाहक बदनामी करुन माझ्या करिअरचं कधीही भरुन न येणार नुकसान झालंय. कौटुंबिक नुकसान झालंय. तमाझे वडील गंभीर आजारी झाले आहेत. माजी सामाजिक प्रतिमा मलिन केल्यामुळे संबंधित महिलांनी व प्रोडक्शन हाऊसने माझी माफी मागावी व नुकसान भरपाई म्हणून 5 कोटी द्यावे अशी मागणी माझ्यावतीने माझे वकील एड. असीम सरोदे करत आहेत."
याशिवाय जेव्हा एखादी तक्रार लेखी स्वरुपात दिली जाते तेव्हा त्याची नोटीस प्रोडक्शन हाउसकडून वाहिनी आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याला दिली जाते. असं असताना मला कधी लेखी तक्रारीची नोटीस का नाही आली. तसंच दोन्ही पक्षांना बोलण्याची संधी दिली जाते. मला अजूनपर्यंत एकदाही प्रोडक्शनकडून माझी बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आलेलं नाही.'
तसंच या प्रकरणाला राजकीय रंगही देण्यात आला होता. या पत्रकारपरिषदेत किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करण्यावर उत्तर देत म्हटलं, राजकारणात जायची इच्छा नाही..मला अभिनयातून भरपूर आनंद मिळतो.