भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
लतादीदी म्हणजे भारतीय संगीत क्षेत्रातील मेरूमणी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लतादीदी आणि संगीत हे जणू एकमेकांसाठीच. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा मंगेशकर भावंडांनी जपला आहे. लतादीदींचे देशातच नव्हे तर परदेशातही चाहते आहेत. हिंदी आणि इतर भाषांमध्येही लतादीदींनी हजारो गाणी गायली आहेत. अलीकडे त्या फारशा गात नसल्या तरी चाहत्यांच्या संपर्कात राहत.
2018 साली सोशल मीडियावर लतादीदींचं एक गाणं वेगाने व्हायरल झालं. “आता विसाव्याचे क्षण’ हे गाणं लतादीदी यांचं निवृत्तीचं गाणं असल्याचा मेसेजही या गाण्यासोबत व्हायरल होत होता. त्यामुळे त्यांच्या फॅन्सनीही नाराजीचा सूर आळवला होता. ही बाब लतादीदींच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी या निवृत्तीच्या बाबींचा साफ इन्कार केला. याबद्दल बोलताना एका मुलाखतीत लता दीदी म्हणल्या की, ‘माझ्या निवृत्तीच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. हे एखाद्या रिकामटेडया व्यक्तीचं काम असावं. मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार आहे.’ लतादीदींच्या या विधानामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला होता.
आता विसाव्याचे क्षण’ ही कविता बा. भ. बोरकरांनी लिहिली आहे. त्याला सलील कुलकर्णी यांनी संगीताचा साज चढवला आहे. हे गाणं जवळपास पाच वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं होतं. पण अचानक या गाण्यासोबत लतादीदींच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पण लतादीदींनीच ही अफवा खोटी असल्याच स्पष्ट केलं होतं. शेवटपर्यंत त्यांनी गाण्यावर प्रेम केलं हेच यातून दिसतं.