अलीकडेच सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हॉलिवूड आणि टॉलिवूड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील भव्य अशा सिनेमाची घोषणा केली. या घोषणेबाबत मतमतांतरं येत असताना फर्जंद, फत्तेशिकस्त अशा ऐतिहासिक सिनेमांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मात्र या निर्णयाचा निषेध केला आहे. या संदर्भात पीपिंगमून मराठीने दिग्पाल लांजेकर यांंच्याशी एक्सक्लुझिव केलेली बातचीत....
मराठी सिनेमा बनवताना दिग्दर्शकाला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. मराठी सिनेमांना थिएटर न मिळणं केवळ हीच एक समस्या प्रेक्षकांसमोर येत असली तर प्रत्यक्षात असं नाही. मुळात मराठी सिनेमांसाठी निधी उभा करणं हे सगळ्यात कठीण काम आहे.
सिनेमासाठी निर्माते मिळवणं, अनेकदा वैयक्तिक खर्चातून सिनेमा बनवला जातो. अनेकदा प्रेक्षकांकडूनही आर्थिक मदत केली जाते. त्यातूनच आपण इतिहास प्रेक्षकांसमोर आणू शकतो. पण आता केंद्राकडे महाराजांचा जीवनपट सिनेमाच्या रूपात समोर आणण्याच्या योजना आहेत.
तर त्यांनी या योजना आमच्यासारख्या दिग्दर्शकांना विश्वासात घेऊन का केल्या नाहीत? या माध्यामातून परकीय कलाकारांना मोठं करण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे.
Happy to note that Martini films, Pink Jaguars entertainment and a couple of co-producers are going to invest $1billion over 5 productions in India which includes movies on Chhatrapati Shivaji Maharaj and on the first war of Indian Independence.
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) February 9, 2020
केवळ भव्य बनावा यासाठी परकिय कलाकारांना प्रोत्साहन देणं हा सरकारचा हेतू चुकिचा आहे. मुळात शिवाजी महाराज ज्या मातीत वाढले तेथील कलाकारांना कोणत्याही विश्वासात न घेता टॉलिवूड आणि हॉलिवूडच्या कलाकारांना ज्यांना महाराज पुरेसे माहिती देखील नाहीत. अशांकडून कोणत्या भव्य कलाकृतीची सरकार अपेक्षा करत आहे. मी आजवर दोन ऐतिहासिक सिनेमे केले आहेत. तिस-या ऐतिहासिक सिनेमावर काम करतो आहे. अनेकदा मला शासनाकडून मिळणा-या अनुदानासाठीही अनेक खेपा घालाव्या लागतात.
सिनेमासाठी फॉरेस्टकडून परवानगी घेणं असो. किंवा आणखी कोणती परवानगी घेणं असो. यात अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. पण यातून मार्ग काढून आम्ही सिनेमे बनवतो. त्यात सरकारच्या अशा धोरणांमुळे आमच्या सारख्या कलाकारांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य सिनेमा बनवणं हेच माझं देखील ध्येय दिग्दर्शक ओम राऊत आणि मी याविषयी चर्चा देखील केली. पण आपले कलाकार कमी पडतात ते आर्थिक बाबींमध्ये अशा वेळी सरकारने परकीय प्रॉडक्शन हाऊससोबत निधी गुंतवून आपल्या कलाकारांवर एकप्रकारे अन्याय करत आहे यात शंका नाही.