छोट्या पडद्यावरची 'आई कुठे काय करते' ही लाडकी मालिका रसिकांच्या गळ्यातला ताईत आहे. या मालिकेतली नवनवी वळणं प्रेक्षकांना खुप भावतात. मालिकेतलं कथानक आता खुपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहचलंय. संजनासाठी अरुंधतीचा पती अनिरुध्द देशमुख मुलांना व आई-वडीलांना सोडून घराबाहेर गेलाय. तो आता संजनासोबतच राहतोय. त्याला कसलीच लाज नाही, उलट त्याचा माज तसूभरही कमी झालेला नाहीय. अशातच अनिरुध्दच्या आईला अजूनही अनिरुध्दवर भाब़डी आशा आहे. तिला वाटतंय त्याला त्याची चूक उमजेल आणि लवकरच तो घरी कायमचा परत येईल.
पण अरुंधतीने मात्र तिचा निर्धार पक्का केलाय. अनिरुध्दपासून तिला घटस्फोट घ्यायचाय, यासाठी केदारला तिने वकीलही शोधायला सांगितलाय. त्यामुळे आता अनिरुध्द-अरुंधती कायदेशीर घटस्फोट घेणार का, त्यांचे मार्ग कसे वेगळे होणार की आणिखी काही रंजक वळण घेणार हे येत्या भागांत मालिकेत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.