2 नोव्हेंबरला बालाघाट (मध्यप्रदेश) विद्या बालन अभिनीत शेरनी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी अभिनेता विजय राज यांना गोंदिया पोलिसांनी अटक केली होती. जामीन मिळाल्यानंतर विजय लगेचच मुंबईला रवाना झाले. या प्रकरणाबाबत आता त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणतात, ‘मलाही 21 वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचं मला भान आहे. आहे. या प्रकरणाचा मला आणि माझ्या घरच्यांना खुपच त्रास झाला आहे. मी गेली 23 वर्षं इंडस्ट्रीमध्ये आहे. मी खुप कष्टाने करीअर बनवलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीदेखील या चौकशी करता एका समिती नेमली आहे. या प्रकारचा मला खूप मोठा धक्का बसला आहे.
माझ्या करिअरवर याचा परिणाम झाला आहे. दुसरी बाजू जाणून न घेता मला थेट आरोपी बनवण्यात आले आहे. याचा त्रास माझ्यासह मुलीला आणि वडिलांनादेखील झाला आहे. ‘मी गेल्या एका वर्षापासून या क्रूबरोबर काम करत होतो. आम्ही सेटवर क्रिकेट खेळायचो. आम्ही सगळे असेच एकत्र राहत होतो. तरीही जेव्हा मला ती माझ्यासोबत काम करण्यास कम्फर्टेबल नाही हे कळले, तेव्हा मी माफी देखील मागितली.
पण सत्य अजून समोर आलेले नाही, मात्र माझे खूप नुकसान झाले आहे. पुढील चौकशीत मी माझे पूर्ण सहकार्य देणार आहे. सत्य लवकरच समोर येईल.’ असेही ते यावेळी बोलले.