मंगळूरूच्या ऐश्वर्या रायने ‘Miss World’ किताबावर नाव कोरलं आणि जग तिच्या सौंदर्याने घायाळ झालं. ऐश्वर्याच्यामुळे बॉलिवूडला देखील नवा चेहरा मिळाला. जीन्स अणि आ अब लौट चले ची फारशी कुणी दखल घेतली नाही. उलट तिच्यावर प्लॅस्टीक स्माईलची टीकाही झाली. पण ऐश्वर्याने या टीकाकाराना कोणतंच उत्तर दिलं नाही की स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा अवाजवी प्रयत्न केला नाही. या दरम्यान तिचा ‘हम दिल दे चुके’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात आतापर्यंत न पाहिलेला अभिनय आणि रुप प्रेक्षकांना दिसलं. या सिनेमाने ऐश्वर्याला रातोरात स्टार बनवलं. त्यानंतर आला ‘ताल’ या सिनेमाने ऐश्वर्याच्या टीकाकारांची तोंडं बंद केली.
एकीकडे ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये बस्तान बसवत होती तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात उलाढाल होत होती. सलमानचं आणि तिचं नातं विस्कटलं होतं. या नात्यातील कुरबुरीचा जाहीर बोभाटा झाला होता. त्यामुळे ऐश्वर्याच्या नुकत्याच सुरुवात झालेल्या करीअरवर त्याचा चांगलाच परिणाम झाला. सलमानमुळे तिच्या करीअरमधील महत्त्वाचा ‘चलते चलते’ हा सिनेमादेखील तिला सोडावा लागला. ऐश्वर्याने सलमानविरोधात केसही केली होती. या प्रकरणामुळे ऐश्वर्याची प्रतिमा काहीशी मलीन झाल्यासारखी झाली.
यानंतर जोश, अलबेला, हमारा दिल आपके पास है, ढाई अक्षर प्रेम के, या सिनेमांनी ऐश्वर्याला काम दिलं पण यश तिच्यापासून लांबच राहिलं. त्यानंतर तिच्या सौंदर्याचा जलवा ‘देवदास’मध्ये दिसला. या सिनेमात तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं. यशिवाय ‘बंटी और बबली’ मधील तिच्या आयटम साँगचीही चर्चा झाली.
या दरम्यान ऐश्वर्याचा ‘प्राईड प्रेज्युडाईस’ नावाचा हॉलिवूड सिनेमाही रिलीज झाला. या सिनेमाने तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. यानंतर उमराव जानमध्ये एक नवीन अदाकारी पाहायला मिळाली. धूममध्ये ऐश्वर्याच्या अल्ट्रा मॉडर्न लूकची कायमच चर्चा झाली. यावेळी ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या अफेअरला पण उधाण आलं होतं. त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. या दरम्यान पुन्हा एकदा ऐश्वर्याचे अफेअर्स आणि भूतकाळाच्या चर्चा होऊ लागल्या. पण यावेळीही तिने टीकाकारांना कोणतंच उत्तर दिलं नाही.
मणिरत्नमच्या गुरु सिनेमाने मात्र पुन्हा एकदा ऐश्वर्याला अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केलं. त्यानंतर तिच्या प्रोव्होक्ड या सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. अभिषेक बच्चनसोबतच्या लग्नापुर्वी ऐश्वर्याने जोधा अकबर सिनेमात जोधाबाई साकारली. या सिनेमाला यशही मिळालं. लग्नानंतर तिने रावण, अॅक्शन रिप्ले हे सिनेमे केले.
मुलीच्या जन्मानंतर तिने जज्बामधून कमबॅक केलं. यानंतर तिच्या फिटनेसची चर्चा झाली. त्यानंतर तिने सरबजीत, ए दिल है मुश्किल या सिनेमात काम केलं. पण म्हणाव्या तशा स्टारडमपासून ही निळ्या डोळ्यांची परी कायमच लांब राहिली. पीपिंगमून मराठी कडून ऐश्वर्या राय बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा