‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे. तब्बल दहा वर्षांनी ते एकत्र आले आहेत.
रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय.घरच्या मंडळींशी, कुटुंबाशी कोणाचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीय. इथे फक्त आधार आहे तो एकमेकांचाच. वेबसिरीजसारखा फॉरमॅट असलेली ही मालिका प्रेक्षकांना आणि खास करुन तरुण वर्गाला खुपच भावली.दिवसेंदिवस या मालिकेतील रहस्यमय उत्कंठा आणखीनच वाढत जातेय. पण आता प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसात ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
विविध ट्विस्टमुळे या मालिकेतील दोस्तांची सर्वच पात्र लोकप्रिय आहेत. त्यातच बाबूराव साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदमसुध्दा प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरले.
‘ती परत आलीये’ मालिकेचा नुकतंच शेवटचा भाग चित्रित करण्यात आला. या मालिकेच्या कथानकानुसार ही मालिका फक्त १०० भागांची आहे, अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. यानुसारच मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पार पडले.