करोना संकट आणि त्यामुळे जाहीर करावा लागलेलला लॉकडाऊन यामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याची परवानगी दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला.
आता आपल्या मनोरंजनाची गाडी हळूहळू रुळावर येतेय असं म्हणायला हरकत नाही, कारण मोजक्याच युनिटमध्ये शुटींगचा पुनश्च हरिओम झाला आहे व लवकरच प्रेक्षकांना नवे भाग पाहायला मिळतील. चला हवा येऊ द्या हा महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम. कधी एकदा तो पुन्हा सुरु होतोय व आपण सर्व त्या हास्याच्या लाटेवर स्वार होतोय असं प्रत्येकाला झालं आहे. आजूबाजूच्या नकारात्मक वातावणात टेन्शन विसरायला लावणारा आणि हसताय ना हसायलाच पाहिजे...हा प्रेमळ आपुलकीचा प्रश्न विचारणा-या निलेश साबळेसह कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे आदी सर्वांचीच महाराष्ट्र वाट पाहतोय. पण आता मात्र लॉकडाऊन नंतर भेटीला येणा-या कार्यक्रमाच्या शूटींगमध्ये प्रेक्षकांना सहभागी होता येणार नाही.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. पण आता तूर्तास तरी स्टुडिओत विनाप्रेक्षक आम्हाला कार्यक्रम सुरु करावा लागेल. यासाठी स्करिप्ट व इतर तांत्रिक बदलांवर काम सुरु आहे. पण यासोबतच मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची खात्री नक्कीच देऊ शकतो.