बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा सुपरस्टार सर्वात व्यस्त असतो. वर्षाला त्याचे सर्वात जास्त सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना बरीच उत्सुकता असते.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकत आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे.
अक्षय कुमारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षय म्हणतो,
“मला क्षमा करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या, जाणून घेतल्या. त्याचा माझ्यावर खुप परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.”
“विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. म्हणूनच मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मला मिळालेल्या पैशाचा मी समाजपयोगी आणि सत्कार्यासाठी वापर करेन.”
“तसेच विमल पान मसाला या ब्रँडने जोपर्यंत या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित करु शकते. पण मी वचन देतो की यापुढे भविष्यात मी फार हुशारीने पर्यायाची निवड करेन. तसेच तुम्ही नेहमी माझ्यावर असेच प्रेम आणि प्रार्थना करत राहा”