हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक खय्याम यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. अखेर आज रात्री सुजॉय हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खय्याम यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांना संगीत दिले आहे. 'कभी कभी', 'उमराव जान' या दोन सिनेमांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही ऐकली जातात. 'उमराव जान' सिनेमांमधील गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच २०११ साली त्यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी संगीत दुनियेतील आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना आजवर राष्ट्रीय तसेच फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने संगीतजगतातील एक तारा निखळला आहे.