आज देशभरात 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. देशाला स्वतंत्र होऊन 72वर्षे पूर्ण झाल्याचा आपण सर्व भारतीयांना गर्व वाटतोय. याच देशभक्तीचा इतिहास उलगडणा-या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य कोणत्या अथक प्रयत्नांतून मिळालंय, हे पटवून दिलं आहे. रुपेरी पडद्यावर स्वातंत्र्याचा हा रोमहर्षक इतिहास मांडणारे सिनेमे पाहून, आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरुन येतोय, म्हणूनच पिपींगमून डॉट कॉमवर खास जाज्वल्य देशाभिमान जागवणा-या मराठी सिनेमांबद्दल जाणून घ्या. वासुदेव बळवंत फडके या सिनेमाची गोष्ट स्वातंत्र्याच्या वेड्याने झपाटलेल्या एका थोर स्वातंत्र्यसेनानी वासुदेव बळवंत फडके यांची आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या सिनेमात स्वातंत्र्यापूर्वीचा काळ उभारण्यात आला असून आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटीशांविरूध्द पहिला सशस्त्र लढा उभारला होता. या सिनेमात चतुरस्त्र अभिनेता अजिंक्य देव याने या व्यक्तिरेखाला पुरेपूर न्याय दिला. हा सिनेमा आपल्याला स्वातंत्र्याचे मोल पटवून देण्यात यशस्वी ठरतो. लोकमान्य: एक युगपुरूष “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”, अशी सिंहगर्जना करत ब्रिटीश राजवटीला हादरवून सोडणा-या लोकमान्य टिळकांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा सिनेमा पाहायलाच हवा. आपण लहानपणी शिकलेल्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलिकडे जाण्याचा कौतुकास्पद प्रयत्न ओम राऊत या तरूण दिग्दर्शकाने केला आहे. बालपणीच्या टिळकांपासून ते लोकमान्य या स्वातंत्र्यसेनानीचा हा प्रवास प्रचंड प्रेरणादायी ठरतो. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे हा टिळकांची भूमिका पडद्यावर मांडण्यात यशस्वी ठरला आहे. क्रांतीवीर राजगुरू भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक राजगुरू यांचा जीवनपट उलगडणारा हा सिनेमा आहे. भगत सिंह आणि सुखदेव या दोन क्रांतीकारकांसह महाराष्ट्रातील क्रांतीकारक राजगुरू स्वातंत्र्यासाठी फासावर चढले. भारतमातेसाठी त्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. अशोक कामले दिग्दर्शित या सिनेमात चिन्मय मांडलेकर, पंकज विष्णू, मिलिंद गुणाजी, शरद पोंक्षे, प्रदीप पटवर्धन, मृणाली जांबळे, आनंद अभ्यंकर, धनश्री चव्हाण आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. क्रांतीवीर सावरकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा इतिहास आपण सर्वच जाणतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या थोर क्रांतीकारकाला जुलमी ब्रिटीश सरकारने त्यांना जन्मठेपेची-काळ्या पाण्याची-शिक्षा सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात ठोठावण्यात आली. ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! अभिनेता शैलेंद्र गौड यांनी सावरकरांची व्यक्तिरेखा हुबेहुब सिनेमात साकारली. सुधीर फडके निर्मित या सिनेमाच्या लेखन- दिग्दर्शनाची धुरा वेद राही यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा प्रत्येक लहान-थोर व्यक्तीने पाहायलाच हवा.