By  
on  

आशयघन सिनेमांची निर्मिती करणाऱ्या 'प्रभात फिल्म कंपनी'चा ९० वा वर्धापनदिन

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरांत नोंदवलं गेलं आहे. या प्रभात फिल्म कंपनीची ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९० वर्ष होत आहेत.

‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता.

कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामलेमामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता.

त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले. पुढे पार्वतीबाई दामले यांनी १ जून १९२९ रोजी या फिल्म कंपनीच्या स्थापनेचा मंगल कलश ठेवला. अशाप्रकारे कोल्हापुरातील मंगळवार पेठेत 'प्रभात फिल्म कंपनी'ची स्थापना झाली.

१९२९ ते १९३२ ह्या दरम्यान 'प्रभात फिल्म कंपनी'ने सहा मूकपटांची निर्मिती केली. तर १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ ह्या बोलपटाची निर्मिती केली. आजमितीस भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे.

१९३४ सालीकंपनीचं पुण्यातील प्रभातनगर येथे स्थलांतर झालं. दामलेमामांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्याकाळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ ची ख्याती होती.

१९३२ ते १९३४ दरम्यान ‘प्रभात’ने ६ बोलपटांची निर्मिती केली. प्रभातचे नाव सिनेजगतात आणि रसिकांमध्ये लोकप्रिय झालं. तर १९३३ मध्ये ‘प्रभात’ने भारतातील पहिला रंगीत बोलपट ‘सैरंध्री’ निर्माण केला.

आज २०१९ साली ‘प्रभात’ च्या वास्तू मध्ये ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ मोठ्या दिमाखात उभी आहे. तेथील प्रत्येक विद्यार्थी आजही कौतुक आणि आदराने बोलतात ते ‘संत तुकाराम’ या सिनेमाबद्दल.

१९३४ ते १९५७ हा ‘प्रभात चा पुण्यातील कालखंड. त्या दरम्यान २६ बोलपटांची निर्मिती झाली.पैकी ९ बोलपटांनी इतिहास घडवला. जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये ह्या बोलपटांची दखल घेतली गेली.

१९५७ साली प्रभात बंद झाली. १९५७ ते १९५९ ह्या  कालावधीत एस.एच केळकर ह्यांनी प्रभात चालवली. पुढे १९६१ साली भारतीय सरकारने ही कंपनी विकत घेऊन ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ची स्थापना  झाली. दामले मामांचे एक स्वप्न होतं की ‘प्रभात’मध्ये चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण द्यावं. प्रभात मध्ये हे साध्य झालं नव्हते, पण त्यांनी उभारलेल्या वास्तूमध्ये आज ‘एफ. टी.आय.आय’ दिमाखात उभं आहे आणि तेथे अनेक विद्यार्थी आज चित्रपट निर्मितीचं रीतसर प्रशिक्षण घेत आहेत.

१९५७ साली ‘प्रभात’ च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे हक्कही विकले गेले. ‘प्रभात’ चा हा सर्व अमूल्य खजिना हळुहळू पडद्यामागे जाऊ लागला. भारतीय चित्रपटांचा हा इतिहाससुद्धा पुसट होत गेला. एक वेळ अशी आली की, ‘प्रभात’चे हे जगविख्यात चित्रपट पहायचे  कसे?  १९६९ साली मात्र उत्तम योग जुळून आला. अनंतराव दामले ह्यांनी प्रभातच्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले. त्यानंतर गावोगाव सदर चित्रपटांचे आठवड्याच्या आठवडे प्रदर्शन  होऊ लागले.

रसिकांना हा ठेवा परत  मिळाला. ‘प्रभात’ पर्वाची परत सुरुवात झाली. बदलत्या काळानुरूप व्हिडिओ, डीव्हीडी आम्ही दामले कुटुंबियांनी बनवल्या.  ‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मिळ फोटो,कागदपत्रे चित्रपट ह्या सर्व ठेव्याचं डीजीटायझेशन व संवर्धनाचे काम आम्हा दामले कुटुंबियांतर्फे आजमितीस सुरु आहे.

प्रभातकारांनी अनेक सामान्य माणसांतून अचूक निवड करून अनेक कलाकार घडवले. ही एक चित्रपटक्षेत्रास ‘प्रभात’ने दिलेली देणगीच होती. देव आनंद या सुप्रसिद्ध कलाकाराचं चित्रपटसृष्टीत  पदार्पण १९४६ साली  प्रभातच्या ‘हम एक है’ ह्या चित्रपटातून झालं.

प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की,  देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची  सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’. एकुणच मराठी सिनेमांचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावण्याचं काम करणारी ‘प्रभात’ कंपनी रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात चिरंतन टिकून राहील.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive