By  
on  

अभिनेत्री मानसी साळवीचं 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, साकारणार आय.पी.एस. ऑफिसर

'काय घडलं त्या रात्री?' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य म्हणजे या मालिकेतून अभिनेत्री मानसी साळवी तब्बल 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा एन्ट्री करत आहे. मानसीने याआधी सौदामिनी, नुपूर या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. असंभव या प्रसिद्ध मालिकेतही मानसीने झळकली होती. या मालिकेत मानसीने शुभ्राची भूमिका साकारली होती. मात्र आता 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एन्ट्री करताना मानसी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या हत्येमागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक करण्यात येते. 

 तिच्या या भूमिकेविषयी बोलताना मानसी सांगते की, "प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं कि त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. 'काय घडलं त्या रात्री?'  या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती  एक तत्वनिष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. १३ वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे आणि ते माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे." 


 तेव्हा ही आय.पी.एस. ऑफिसर त्या मृत्युमागील गुढ कसं उलगडणार, सध्या टेलिव्हिजवर असलेल्या मालिकांच्या गर्दीत ही मालिका कशी वेगळी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. येत्या 31 डिसेंबरपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive