By  
on  

'ती परत आलीये' मालिकेत विजय कदम बोलणार त्यांचीच बोलीभाषा

 ती परत आलीये या मालिकेविषयी अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे. मालिकेच्या विविध प्रोमोंनी या मालिकेत नेमकं काय असणार हा विचार करायला भाग पाडलय. या मालिकेचे उत्कंठावर्धक प्रोमो पाहुन प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रसिद्ध अभिनेते विजय कदम हे या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेतून ते टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहेत. 

या मालिकेच्या निमित्ताने विजय कदम हे त्यांचीच बोलीभाषा बोलत असल्याचा त्यांना आनंद आहे. या मालिकेविषयी सांगताना ते म्हणतात की, "मी साकारत असलेली बाबूराव तांडेल ही भूमिका अत्यंत वेगळी आणि चौकटीच्या बाहेर जाऊन सादर होणारी असल्याने माझ्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विजय कदम हा विजय कदम न वाटता तो वेगळा वाटायला हवा. त्या पात्रातून तो पोहोचायला हवा. साडेचार महिन्यांपूर्वी नीलेश मयेकरांनी या मालिकेविषयी मला विचारले आणि मी तातडीने होकार कळवला. जी बोलीभाषा मी लहानपणापासून बोलत आलोय, ऐकत आलोय त्याच बोलीभाषेत आज भूमिका करताना आनंद होतो आहे. सर्वसाधारण कोकणातील माणूस, स्पष्टवक्ता, आजचा दिवस आनंदाने जगणारा असा हा बाबूराव आहे. तो धाडसी असल्याचे लोकांना वारंवार भासवत असतो, पण पायाखालून उंदीर गेला तरी तो घाबरतो. बरे याचे उत्तरही त्याच्याकडे तयार असते. असे गमतीशीर हे पात्र आहे. मी सस्पेन्स थ्रिलर खूप पाहिले आहेत आणि शैलीमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती जी या मालिकेमुळे पूर्ण झाली आहे. या मालिकेत मला एका उत्तम भूमिका साकारायला मिळतेय, या कथानकाचा सूत्रधार मी असल्यामुळे मला काम करताना खूप मजा येतेय."

ती परत आलीये म्हणजे ती नक्की कोण आहे याबद्दल सांगताना ते म्हणाले की, "ती कोण आहे हे मला माहितीय पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल."

 

ही मालिका प्रदर्शित होत असलेल्या झी मराठी वाहिनीवर विजय कदम यांनी ‘घडलंय बिघडलंय’ ही मालिका केली होती. त्याविषयी ते सांगतात की, "याच वाहिनीवरील ‘घडलंय बिघडलंय’ ही मालिका आम्ही आठ वर्षे केली. ज्यामध्ये मी हवालदार होतो. त्यात मी सोबतच्या शिपायाला ‘शिपॉय….तुला काय कळतं का नाय’ अशी हाक मारायचो. अशी हाक पोलीस दलातील अधिकारीही गमतीने आपल्या कर्मचाऱ्यांना मारत असल्याचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले आहेत. हीच कदाचित कामाची पावती असते."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive