By  
on  

'तू सौभाग्यवती हो' मालिकेत रंगणार सूर्यभान आणि ऐश्वर्याचा विवाहसोहळा

गावचं प्रस्थ असलेला करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांची कहाणी 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत पाहायला मिळतेय. ऐश्वर्या आता जाधवांच्या घरची सून कधी होणार याची अनेकांना उत्सुकता लागली असेल.

 तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं. 

आता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीची गोळी घालून हत्या केली जाते. आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते. 

तेव्हा ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळावेगळा विवाहसोहळा आता पार पडणार आहे. यासाठी विवाह सप्ताह विशेष भाग 1 जूनपासून पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive