By  
on  

'पाहिले न मी तुला' मालिकेत समरचं खरं रुप येणार समोर, समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे ?

पाहिले न मी तुला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी या कलाकारांच्या पात्रासह मालिकेतील एक पात्र लक्षवेधी ठरतय. ही व्यक्तिरेखा म्हणजे समर प्रताप जहागीरदारची. अभिनेता शशांक केतकर ही भूमिका साकारतोय. या भूमिकेतून शशांक पहिल्यांदाच खलनायक म्हणजेच नकारात्मक भूमिका साकारतोय. 

या मालिकेत एकीकडे अनिकेतने मनूची स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. तर दोघं सुंदर असं स्वतःचं घर उभं करणार आहेत. प्रेमाच्या बळावर, एकमेकांवर असलेल्या विश्वासाने ते त्यांचा संसार फुलवणार आहेत. घरच्यांचा राग घालवून त्यांचा आशीर्वाद घेऊन अनिकेत मनूला सुखी आयुष्य जगायचं आहे, पण या गोष्टीमुळे अपमानित आणि सैरभैर झालेला समर मानसीसाठी ईर्षेला पेटलेला आहे.

या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोंमध्ये पाहायला मिळतोय. समर हा खऱ्या आयुष्यात समर जहागीरदार नसून विजय धावडे असल्याचं लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. समर हा स्वार्थी, दुष्ट, कपटी, स्त्री-लंपट, डूख धरणारा, बदला घेण्याची वृत्ती असलेला, एखादी वस्तू किंवा व्यक्ती मनात भरली की ती मिळेपर्यंत जीवाचं रान करणारा, वाट्टेल त्या थराला जाणारा असा दाखवण्यात आलाय. तर विजय धावडे उर्फ विज्या खाचखळग्यातून चुकीच्या मार्गाने आयुष्य जगणारा, स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची वाताहत करणारा इसम आहे. लाल डोंगरी नावाच्या झोपडपट्टीत राहणारा. तिथल्या वाईट संगतीत तयार झालेला, मागून मिळत नाही तर हिसकावून घेणारा, लालची असा विजय आहे. संगीता नावाच्या गरीब साध्या भोळ्या मुलीशी लग्न करून त्याने संसार थाटलाय. यामागेही खास कारण म्हणजे ती त्याच्यासाठी लकी आहे. आता समरचं हे खरं रूप सगळ्यांसमोर कधी येणार हे मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive